पिंपरी – खराळवाडी, गांधीनगरमधील नागरी समस्या पंधरा दिवसात सोडवा, अन्यथा महानगरपालिकेवर हजारो त्रस्त नागरिकांचा मोर्चा काढू असा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
खराळवाडी, गांधीनगर, मोनिका सोसायटी, कामगारनगर या परिसरात अस्वच्छतेमुळे डासांचा त्रास, वेळेत कचरा उचलला जात नाही, अनियमित व अवेळी कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, भटक्या कुत्र्यांची समस्या, पथदिवे बंद असल्यामुळे महिला भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना, सार्वजनिक शौचालयांची नियमीत साफ सफाई केली जात नाही, त्यामुळे दुर्गंधी व रोगराईने नागरिक त्रस्त आहेत.
अनियमित व अवेळी कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्यामुळे महिला भगिनींमध्ये तीव्र संताप आहे. प्रभाग क्र. 9 मधील खराळवाडी, गांधीनगर, कामगारनगर तसेच रॉयल पार्क सोसायटी, महिंद्रा ॲन्थिया सोसायटीतील पाणी समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी मागील पंचवार्षिक योजनेत महिंद्रा कंपनीच्या आयटूआर प्रकल्पातून मिळालेल्या जागेत पाण्याची टाकी मंजूर करुन घेण्यात आली. तिचे काम संथगतीने सुरु आहे. पाणी पुरवठा वेळेत होत नाही. रात्री – अपरात्री येणारे पाणी कमी वेळ व कमी दाबाने असते. महिला भगिनी त्रस्त झाल्या आहेत. रस्त्यांवरील पथदिवे बहुतांश वेळी रात्री 10 नंतर बंदच असतात. त्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहिल. तसेच गांधीनगर मध्ये असणा-या सार्वजनिक शौचालयांची रोजच्या रोज साफसफाई केली जात नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचा प्रार्दुभाव आहे. अंतर्गत रस्ते, पदपथ स्वच्छ नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छ भारत अभियानाचा गांधीनगर मध्ये बोजवारा उडाला आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण करण्याचा मनपाचा दवाखाना हाकेच्या अंतरावर आहे. परंतू त्याचा उपयोग या प्रभागाला होत नाही. भटकी कुत्री दुचाकी वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाचे औषधोपचारासाठी लागणारे इंजेक्शन मनपाच्या बहुतांशी दवाखान्यात उपलब्ध नाहीत. गरीब रुग्णांना पैसे खर्च करुन बाहेरुन ती इंजेक्शन आणावी लागतात. यावर देखिल प्रशासनाचे नियंत्रण नाही. भटकी कुत्री पकडण्यासाठी असणारी यंत्रणा निष्क्रीय ठरली आहे. या उद्भवलेल्या सर्व समस्यांना मनपा प्रशासन जबाबदार आहे. यावर आगामी पंधरा दिवसात योग्य ती कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी करावी, अन्यथा हजारो नागरिकांचा मोर्चा महानगरपालिकेवर काढू यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहिल, असेही डॉ. कदम यांनी पत्रात म्हटले आहे.