गोंदिया येथे नागरी सत्कार समारंभ
गोंदिया : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी विधानसभा अध्यक्ष या पदाचा उपयोग करुन घेण्यात येईल. राज्यातील सर्वांना न्याय मिळवून देण्यासोबतच राज्याला दिशा देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
गोंदिया येथील सुभाष हायस्कूलच्या मैदानावर 8 डिसेंबर रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समितीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदी आमदार नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल तसेच दोन्ही जिल्ह्यातील नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात सत्काराला उत्तर देताना श्री. पटोले बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून रिपाई(गवई गट)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई हे होते. आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार मधूकर कुकडे, माजी मंत्री भरत बहेकार, नाना पंचबुद्धे, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंग पवार, के.आर. शेंडे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सूनील फुंडे, मुकेश शिवहरे, पंचम बिसेन, पुरुषोत्तम कटरे, गोंदिया न.पा.उपाध्यक्ष शिव शर्मा, धनंजय दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पटोले म्हणाले, माझ्या जन्मगावी हा सत्कार होत असल्याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी त्या गावाचा विकास आराखडा तयार करावा व तो आपल्याला सादर केल्यास आपण निश्चितच या गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहोत. दोन्ही जिल्ह्यातील जनतेचे आपल्यावर ऋण आहेत त्याची परतफेड त्यांचा विकास करुन आपल्याला करावयाची आहे. दोन्ही जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांची निश्चितपणे आपण सोडवणूक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे पाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 9 तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगून श्री. पटोले म्हणाले, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सिचंनाची व्यवस्था मोठया प्रमाणात निर्माण होवून जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे. बेरोजगारीवर देखील सिंचन सुविधेमुळे मात करता येईल. दोन्ही जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या व्यवस्थेवर आपला भर राहणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीचे पैसे दोन दिवसात देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दोन्ही जिल्हयात आणखी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
धानाची भरपाई आठ दिवसात झाली पाहिजे अशी सुविधा निर्माण करण्यात येईल असे सांगून श्री. पटोले म्हणाले, दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्य सरकारच्या निधीचा योग्य वापर विकास कामासाठी झाला पाहिजे याकडे आपले विशेष लक्ष राहणार आहे. सर्वांनी मिळून दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्यास हातभार लावला पाहिजे तरच जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. मागास जिल्हे म्हणून दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे ही आपण मिटवून टाकू. गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
श्री.पटेल म्हणाले, आजच्या या नागरिक सत्कार समारंभाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष आज एकत्र या मंचावर दिसत आहे. दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व एकत्र आले आहेत. विकासासाठी एकत्र येऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन श्री पटले पुढे म्हणाले, नाना पटोले हे संघर्षमय व्यक्तिमत्व आहे. आमचे कर्तव्य आहे की ज्या जनतेमुळे हे पद आम्हाला मिळाले आहे त्यांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वच नेते विकासासाठी एकत्र येतांना दिसतात, आपल्याकडे मात्र असे होतांना दिसत नाही, ते झाले पाहिजे तरच आपल्या दोन्ही जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल.
राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर अध्यक्ष म्हणून आली असल्याचे सांगून श्री. पटेल म्हणाले, धापेवाडासारखे आणखी काही बंधारे जिल्ह्यात बांधण्यात येतील. त्या बंधाऱ्यातील पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता धानासोबतच अन्य पिकांकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा वापर अन्य पिकांसाठी केला तर जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हयातील शेतकऱ्यांना आज दिशा देण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा हातभार लागला तर जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल. आणि हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत अग्रेसर झालेली दिसतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अग्रवाल, आमदार भोंडेकर, आमदार चंद्रीकापूरे, आमदार रहांगडाले, आमदार कारेमोरे, आमदार कोरोटे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. आभार विनोद जैन यांनी मानले.