नगर : अहमदनगर नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरच्या नामांतराबाबत शासनदरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारकडून अहमदनगर महानगरपालिकेला यासंबंधांत पत्रही गेलं आहे. यामध्ये महासभेत नामांतराचा प्रस्ताव मांडून बहुमताचा ठराव पारित करून सरकारकडे परत पाठवण्याचा आदेश दिला आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर झाल्यानंतर आता अहमदनगरचं ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ हे नाव ठेवण्याची चर्चा जोर धरते आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही लक्षवेधी विधानपरिषदेत मांडली होती. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं बोलताना सांगितलं.
एकीकडे शिंदे- भाजप सरकार अहिल्यादेवी या नावाचा नामांतरणासाठी विचार करत असल्याचं समोर आलं आहे. तर शिवसेनेने यापूर्वीच अहमदनगरचं अंबिकानगर असं नामांतरण करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या मुद्द्यावरून शिवसेना आणि सत्ताधारी पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली आहे.