चौफेर न्यूज : देशात एकता, समता, बंधुता नांदावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारताचे संविधान निर्माण केले. त्यामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगतो आहे. संविधानातील घटनात्मक मुल्यांचे जतन करून प्रत्येकाने भारतीय संविधानाचा अंगिकार केल्यास तेच खरे महामानवास अभिवादन असेल, असे प्रतिपादन प्राचार्या अनिता पाटील यांनी केले.
भारतीय संविधानामुळे देश विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. भारतीय संविधानाच्या तत्वांचे पालन करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून घटनेमध्ये असलेल्या कर्तव्यांचे पालन करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय संविधानाप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी पार पाडावी लागते त्यामुळे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या कार्यकारी मंडळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कायदेमंडळ, न्यायपालिका यादेखील लोकशाहीचे महत्वाचे स्तंभ असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अर्चना देसले, रिनल मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.