पिंपरी विधानसभेसाठी पुढेही कायम झटत राहणार
पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथआ भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज सोमवारी मुंबईत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी आपण माघआर घेतली असून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाल्याने महायुतीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपचे अमित गोरखे यांनी बडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्यानंतर आज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेण्याची अंतिम मुदत होती. तत्पूर्वी मुंबईत सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित गोरखे यांची बैठक झाली. यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यमंत्री सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह शहरातील नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर पिंपरी विधानसभा निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यावेळी महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग बारणे, प्र प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे आदी उपस्थित होते.
या संदर्भात अमित गोरखे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचा विजय महत्त्वाचा आहे. बंडखोरी करून निवडणूक लढविण्यास महायुतीचे नुकसान होईल. त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये. यासाठी पिंपरी विधानसभेच्या रिंगणातून आपण माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, निवडणुकीत महायुतीने दिलेले उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी एकदिलाने झटणार आहोत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, अशी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्र परिवाराची इच्छा होती. त्यांसाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु, त्यांचे हे पाठबळ वाया जावू देणार नसून आगामी काळात देखील पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी कायम झटत राहणार असल्याचे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.