पिंपरी । पूर्वी विविध कार्यक्रमात पाहुणे व विजेत्यांना पुस्तक देण्याची परंपरा होती, त्यामागे वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा आयोजकांचा उद्देश होता. आता हे चित्र दिसून येत नाही. जो कोणी आपण वाचलेले पुस्तक दुसर्यांना सांगतो. तो माझ्या मते चांगला वाचक आहे. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तकाच्या किंमती वाचकांना परवडतील, अशा आवाक्यात असाव्यात असे मत वक्ते डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागांतर्गत ज्ञानविज्ञान वाचन चळवळ आणि चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ज्ञान विज्ञान चळवळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, कार्यकेंद्रवाहक प्रा. जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.
श्री. काळे यांनी विविध लेखकांच्या कथा, त्या कथेमधील विविधता, कथेची रचना आदींबाबत सखोल माहिती देवून पुस्तक व कथा वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी विविध उदाहरणे दिली. दुसर्या पुष्पात वक्ते जयकर गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत व्हावा, हा महत्त्वाचा संदेश दिला.
तिसर्या पुष्पात वक्त्या डॉ. चारुशिला पाटील यांनी स्वतः लिहीलेल्या पुस्तकांची माहिती देताना त्या-त्या पुस्तकाचे महत्त्व विषद केले अशाप्रकारे तीन दिवसीय व्याख्यानमालेची सांगता झाली.