चौफेर न्यूज – कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडत जनजीवन सुरळीत होऊ पाहत असले तरी कोरोनासोबतच जगताना काही बाबतीतले व्यवहार वर्तन कसे बदलावे लागेल याचा नेमका अंदाज बांधता येणो अजूनही मुश्कीलच असल्याचे दिसून येत आहे. अशा बाबतीत शिक्षणाचा विचार प्राधान्यक्रमाने करावा लागेल, कारण यासंदर्भात पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणासारखे अनेक मुद्दे चर्चिले जात असले तरी शासन, शिक्षण संस्थाचालक व विद्यार्थी-पालक यांच्या दृष्टीने त्यातील व्यवहार्यता महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच अपूर्ण राहिलेल्या काही परीक्षा तसेच शाळा, महाविद्यालयांची पुढील वाटचाल यासंबंधाची संभ्रमाची स्थिती अद्याप टिकून आहे.
गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेली लॉकडाऊनची स्थिती आता संपुष्टात आली आहे. काही अटी शर्तीवर अनलॉक झाल्याने बाजारपेठा सुरू झाल्या आहेत, मोजक्या कर्मचा-यांच्या बळावर सरकारी-निमसरकारी कार्यालये सुरू झाली आहेत तसेच उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर उद्योग व्यवसायही सुरू करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. लग्नकार्य होऊ लागली आहेत, खरेदीसाठी तर झुंबड उडालेली पहावयास मिळत आहे. हळूहळू सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होताना दिसत आहे. कोरोनामुळे भयाचे सावट असले तरी, यापुढील काळात कोरोनासोबतच जगायचे आहे हे निश्चित असल्याने आता एकूणच चलनवलनाचा पुनश्च हरिओम होताना दिसत आहे; पण यात बाकी सारे सुरू झालेले दिसत असले तरी शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार करता शाळा-महाविद्यालयांबाबतची स्थिती अजूनही संभ्रमाचीच असल्याचे दिसते. नेहमीप्रमाणे 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे सांगितले गेले असले तरी या शाळा फक्त शिक्षकांसाठी व कर्मचा-यांसाठी सुरू झाल्या आहेत, विद्यार्थ्यां साठी अजूनही शाळेची घंटा वाजलेली नाही. ती केव्हा वाजेल याबाबतही आज स्पष्ट सांगता येत नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांचे खोळंबलेले निकाल जुलैपर्यंत लावण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून, पुढील अॅडमिशन ऑगस्टर्पयत सुरू केले जाण्याचे म्हटले आहे खरे; परंतु तेदेखील त्याच वेळेत होईल याची शाश्वती देता येणारी नाही. विशेषत: शासनाकडून शाळा सुरू करण्याबाबतचा अट्टाहास केला जात असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारीदेखील शाळांवर सोपविली गेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचे, की त्यांच्या आरोग्याची काळजी वाहायची असा प्रश्न शिक्षण संस्थाचालकांपुढे उपस्थित झाला आहे.
ऑनलाइन पर्यायाचा बोलबाला मोठया प्रमाणात होत आहे. अलीकडचे काही शिक्षणतज्ज्ञ म्हणवणारे ऑनलाइनवर भर देताना दिसत आहेत; परंतु त्यात सामान्य कुटुंबातून येणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा पर्याय परवडणार आहे का याचा विचारच होताना दिसत नाही. अशा विद्यार्थ्यां च्या साधन उपलब्धतेचे काय? एकीकडे लॉकडाऊनमळे नोक-या गमावलेले व उत्पन्नास मकलेले अनेक नागरिक आपल्या मोबाइलचे रिचार्ज करू शकत नसताना ते पालक आपल्या मुलांसाठी नवीन मोबाइल घेणे कसे शक्य आहे? इंटरनेट डाटाची उपलब्धता व त्याचा स्पीड यासारख्या बाबी आणखीनच वेगळ्या, तेव्हा या व्यावहारिक बाबींकडे लक्ष न देताच शाळा भरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने शिक्षण संस्थाचालक व पालक या दोघांच्याही पातळीवर संभ्रमाची स्थिती वाढली आहे.
कोरोनाच्या धास्तीतन फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत मुलांना एकमेकांपासन विलगीकरण अवस्थेत शाळेत बसवायचे तर तीच मोठी समस्या शिक्षकांसमोर राहणार आहे. बरे,शाळेत शिक्षक विद्यार्थ्यां वर कडक नजर ठेवतीलही, परंतु शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर हे विद्यार्थी त्यांच्या मित्रंसोबत एकत्र येतात व एकत्रपणे घरी जातात त्या स्थितीत त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा प्रश्न कायम राहील; शिवाय या विद्यार्थ्यां च्या आरोग्यासाठी सॅनिटायझरपासून त्यांची तापमोजणी करायची तर त्यासाठी जो खर्च येणार आहे तोदेखील शाळांनाच करावयाचा आहे.शासन तो खर्च देणार नाही व विद्यार्थ्यां कडूनदेखील फीमध्ये तो घ्यायचा नाही, मग कुणीही संस्थाचालक हा खर्च खिशातून किती दिवस करतील हा प्रश्नच आहे.
एकूणच कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो झाल्यासारखी स्थिती असली तरी ती बदलण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. प्राथमिक शिक्षण ते पदव्युत्तर म्हणजे केजी टू पीजी अशा वेगवेगळ्या अवस्थेतील विद्यार्थ्यांचे व शाळा-महाविद्यालयांचे आपले वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. यातून सुवर्णमध्य काढत पुढील दिशा ठरवावी लागणार आहे; पण ती ठरवताना जशा बाजारपेठा सुरू करून दिल्या तशा हातघाईने विचार करून चालणार नाही. त्यासाठी र्सवकष भूमिका घ्यावी लागेल. शिक्षण संस्थाचालकांपुढील अडचणी समजून घेतानाच विद्याथ्याच्या भविष्याचाही विचार प्राधान्याने करावा लागेल. उद्याच्या आव्हानांशी तोंड देणारे नागरिक घडवायचे तर त्या पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल, नसता कोरोनातील ग्रॅज्युएट असा शिक्का घेऊन फिरणा-यांकडे वेगळ्यादृष्टीने पाहिले गेले तर त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतील, तेव्हा हा विषय गांभीर्याने हाताळला जावयास हवा.