चौफेर न्यूज – राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार आहे.
कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेचा निकाल हा अंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येइल अस सांगितल जात आहे. तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली आहे. कोव्हीड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.