चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या परीक्षा केवळ पुणे विभागातच होणार आहेत का, असा सवाल मुंबई परिसरातील मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधींनी केला आहे. बोर्डाच्या लेखी परीक्षांच्या नियोजनासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीत पुणे वगळता मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील एकही मुख्याध्यापक आणि शाळांचे प्रतिनिधी नेमण्यात आलेले नाहीत. या सल्लागार समितीवर मुख्याध्यापक संघटना नाराज असून मुंबईतील शाळांना कोरोनामुळे असंख्य अडचणी असताना समितीकडून कोणतीही विचारणा झालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच या परीक्षेच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन केली आहे, मात्र या समितीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिस्थिती नेमकी काय आहे, याची साधी विचारणा केली जात नसल्याचा आरोप बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी केला आहे.
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली असून त्यातही दहावी, बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला होता. मागील वर्षापासून मुंबई आणि परिसरात शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ही पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे सर्वात जास्त येथील शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या कशा घ्यायच्या यावरही आम्ही संभ्रमात असून यावर सल्लागार समितीकडून साधी विचारणा केली जात नसल्याचे रेडीज यांनी सांगितले.