चौफेर न्यूज – दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पार पडणार यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी शाळा स्तरावर होणाऱया पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना मिळत नसल्याने या परीक्षांबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आहे. त्याप्रमाणे वर्षभर अभ्यासाचे ऑनलाईन धडे गिरवणाऱया नववीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करायचे की कसे? असा सवाल काही शाळांनी उपस्थित केला आहे.
दहावीचा निकाल 100 टक्के लावण्यासाठी ढ विद्यार्थ्यांना नववीतच नापास करणाऱया काही शाळांना नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा, त्यांचे मूल्यमापन याविषयी काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घ्यायची की त्यांना ऑफलाईन परीक्षेसाठी शाळेत बोलवायचे याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना शिक्षण विभागाकडून मिळाल्या नसल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे नववी नापासांची फेरपरीक्षा कशी घेणार ?
गेल्या वर्षी नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे ठरले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेरपरीक्षेचे स्वरूप संदिग्ध होते. मात्र यंदा शाळांनी जर विद्यार्थ्यांना नववीत नापास केले तर या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा कशी घेण्यात येणार, नापास मुलांचे वर्ष तर वाया जाणार नाही ना, असा प्रश्न पालक विचारीत आहेत.