चौफेर न्यूज – कोरोनामुळे 10वी, 12 वीचे जे विद्यार्थी नियोजित वेळेतील परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील, तसंच तो राहत असलेला विभाग सील केला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्यांची जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे यादरम्यान होईल. या परीक्षेला विद्यार्थी बसू शकला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.
परीक्षा नियोजित तारखेलाच आणि ऑफलाईन पद्धतीने
कोरोना परिस्थितीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातच होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
पेपरचा वेळ 30 मिनिटांनी वाढवला
दहावी आणि बारावीच्या 80 गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यानं 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना एकूण 1 तासासाठी 20 मिनिटांप्रमाणं वेळ वाढवून देण्यात येईल.
पात्यक्षिक परीक्षा
10 वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षाऐंवजी कोरोनामुळे विशिष्ट लेखन कार्य म्हणजे असाईनमेंट द्यावे लागतील. असाईनमेंट सादर करण्यासाठी 21 मे 10 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 12 वी साठी प्रात्याक्षिक परीक्षा 22 मे ते 10 जून दरम्यान होईल. 12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत. असाईनमेंट किंवा प्रात्याक्षिक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाला कोरोना झाल्यास त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.