चौफेर न्यूज – दहावीची लेखी परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करायचा, हा प्रमुख प्रश्न शालेय शिक्षण विभागासमोर आहे. याप्रकरणी शिक्षण विभाग राज्यातील शिक्षणतज्ञांसोबत ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांशी चर्चा करीत असून सोमवारी मुंबई, पुणे येथील कॉलेजच्या प्राचार्यांसोबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ऑनलाइन बैठक पार पडली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी एखादी ऑनलाइन परीक्षा घ्यावी, अथवा अंतर्गत चाचणी घेऊन गुण दिले जावेत अशा सूचना प्राचार्यांनी केल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्याच्या मूल्यमापनाविषयी अद्याप कोणतेही धोरण ठरलेले नाही. आज पार पडलेल्या बैठकीत प्राचार्यांनी दहावीत विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्याची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
बैठकीत या मुद्दय़ांवर झाली चर्चा
- दहावीच्या विद्यार्थांना पास करण्यासाठी त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन यासोबत आठवी, नववीतील गुणांचा विचार करून श्रेणी दिली जावी.
- दहावीच्या विषयातील बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांकडून ती ऑनलाइन सोडवून घ्यावी.
- एखादी चाचणी परीक्षा घेऊन त्यातील गुण ग्राह्य धरले जावेत.
- अकरावी प्रवेश हे सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन पद्धतीपेक्षा आरटीई प्रवेशाप्रमाणे उपसंचालक अथवा महाविद्यालय स्तरावर लॉटरी काढून केले जावेत.