चौफेर न्यूज – देशात गेल्या वर्षीपासून पसरलेल्या कोरोना विषाणू साथीनं शिक्षण क्षेत्रासमोरही मोठी आव्हानं उभी केली आहेत. गेलं शैक्षणिक वर्ष ऑनलाईन शाळा, व्हर्च्युअल लेक्चर्स यातच गेल्यानंतर दहावी, बारावी आणि पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा तरी यंदा उशीरा का होईना; पण सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाची साथ आणखीनच तीव्र झाली आणि या सर्वच महत्त्वपूर्ण परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले. महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया या परीक्षांवर अवलंबून असल्यानं या परीक्षा घेणं आवश्यक आहे, पण सध्या कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेनं परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळं सद्यस्थितीत परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न विद्यापीठांसमोर उभा राहिला आहे.
त्यामुळं आतातरी UGC ने देशातील सर्व विद्यापीठांना पूर्व नियोजनानुसार मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा (Offline Exams) आयोजित न करण्याचा आदेश दिला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल,असंही आयोगानं म्हटलं आहे. याबाबत आयोगानं एका अधिसूचनेद्वारे मार्गदर्शक सूचनाही (Guidelines) जारी केल्या आहेत. याबाबत जारी केलेली नोटीस ugc.ac.in वर उपलब्ध आहे.
सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठानी ऑनलाइन परीक्षा (Online Exams) घेण्याचा निर्णय घ्यावा असं आयोगानं सुचवलं आहे. परीक्षांच्या बाबतीत आयोगानं काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. केंद्र,राज्य सरकार, शिक्षण मंत्रालय आणि UGC यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करून एखादी संस्था ऑनलाइन परीक्षा घेण्यास सक्षम असेल तरच त्या संस्थेला ऑनलाइन परीक्षा घेण्याची परवानगी दिली जाईल, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
-आयआयटी, एनआयटी, केंद्रीय विद्यालये आदी सर्व केंद्रीय शैक्षणिक संस्थांनी मे महिन्यात ऑफलाइन परीक्षा घेऊ नयेत.
-जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊन चर्चा केली जाईल.
– शैक्षणिक संस्थामध्ये लोकांनी एकत्र येऊ नये.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यं आणि केंद्रीय विद्यालयांनी या आधीच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. परीक्षा काही होणार,निकाल कधी लागणार आणि पुढचं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना भेडसावत आहे.