चौफेर न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने यंदाच्या वर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतरही राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार? त्यांना गुण कशा प्रकारे देणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावे याच्या संदर्भातील निर्णय सोमवारी शिक्षणमंत्री घेणार असून राज्य सरकारच्या वतीने नियमावली सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील दहावीच्या परीक्षा होण्याची शक्यता मावळल्याचे दिसत आहे.