चौफेर न्यूज – कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत, यावर बराच काळ चर्चा झाल्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्या; मात्र त्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कशाच्या आधारावर करायचं, या मुद्द्यावरच्या चर्चेने वेग घेतला आहे. तरीही त्यातून अद्याप ठोस काही मार्ग निघालेला नाही. 10वी आणि 11वीची अंतिम परीक्षा आणि बारावीची पूर्वपरीक्षा यामधल्या मार्क्सनुसार 30:30:40 अशा फॉर्म्युल्याने सीबीएसईच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स (CBSE 12th Class Result 2021) दिले जाण्याची शक्यता आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी (Assessment) मार्ग सुचवण्याकरिता 13 सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती 30:30:40 या फॉर्म्युलाची शिफारस करण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ही समिती 17 जून रोजी आपला फॉर्म्युला (Evaluation Formula) सुप्रीम कोर्टात सादर करणार असून, त्यानंतर तो जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर एक जून रोजी सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या परीक्षा मंडळांनीही तोच कित्ता गिरवला. परीक्षा रद्द झाल्या खऱ्या; पण विद्यार्थ्यांच्या पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी त्यांचं मूल्यांकन होणं आवश्यक असून, त्यावर आता घोडं अडलं आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षांच्या आधारे मूल्यमापनाची तयारी काही महाविद्यालयांनी दर्शवली; मात्र मुंबईतल्या एकाही महाविद्यालयात वर्षभरात एकदाही प्रत्यक्ष वर्ग न भरल्याने परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स (Practicals) झालीच नाहीत. मुंबई महानगर प्राधिकरण भागातल्या काही महाविद्यालयांना नोव्हेंबरनंतर परवानगी मिळाल्यावर ऑफलाइन टेस्ट्स (Offline Tests) आणि प्रॅक्टिकल्स घेण्यात आली होती. ज्या शाळा/महाविद्यालयांना प्रॅक्टिकल्स/तोंडी परीक्षा (Orals) घेता आलेल्या नाहीत, त्यांनी आता ऑनलाइन स्वरूपात त्या घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बारावीच्या या अंतर्गत मूल्यमापनातले गुण 28 जूनपर्यंत सीबीएसईच्या यंत्रणेत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनेकजण 11वीला फारसं गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे 11वीच्या मार्कांचा बारावीच्या मूल्यमापनात समावेश करणं अन्यायाचं ठरेल, असं मत एका प्राचार्यांनी व्यक्त केलं. राज्य मंडळातून दहावी झालेले अनेक विद्यार्थी 11वी, 12वीला सीबीएसई बोर्डाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. त्यांचं मूल्यांकन 10वीपासून करणं अवघड ठरेल, असं मत एका प्राचार्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थी आणि पालकांचंही या फॉर्म्युल्याबद्दल फारसं चांगलं मत नाही. यापेक्षा परीक्षा घेतली गेली असती, तर बरं झालं असतं, ही एका पालकाची प्रतिक्रिया आहे. सीबीएसई नेमका कोणता पर्याय काढते, याकडे राज्य मंडळांचं लक्ष आहे. कारण त्या पर्यायाचा त्यांच्या मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठीही त्यांना उपयोग होऊ शकतो.