चौफेर न्यूज – येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचे संकेत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिकेच्या ४०० शालेय इमारतींचे सॅनिटायझेशन पुढील ६ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्यांतून दोन वेळा मोफत मास्क देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.
जून महिन्यात शाळा सुरु होतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरु आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु होण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचा शिरकाव शाळेत होऊ नये यासाठी आरोग्य विभागाशी चर्चा सुरु आहे.
मुंबई पालिकेच्या शाळेत तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून १० हजारांहुन अधिक शिक्षक आहेत. तर अन्य कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणे शिक्षण विभागाची जबाबदारी असून सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेसह राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत. कोरोनावर लवकर मात करण्यात आरोग्य विभागाला पूर्णतः यश मिळेलच.मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर शाळांत कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याबाबत शिक्षण विभाग आपल्या परीने तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या १,१८७ शाळा असून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान आहे. परंतु शिक्षण विभागाने याबाबतही योग्य ती दक्षता घेतली असून प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगचे नियम कशा प्रकारे पाळावेत याबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात धडे दिले जात आहेत.
उपाययोजना करणार
सॅनिटायजर, दोन विद्यार्थ्यांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवणे, शाळांमध्ये जंतूनाशक फवारणी करणे, हात स्वच्छ धुण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.