चौफेर न्यूज – कोरोनानंतरच्या काळात डिजिटायझेशनचे प्रमाण खूपच वाढले असून देशभरातील तब्बल 86 टक्के शाळांचा डिजिटायझेशन करण्याकडे कल असल्याचे इंडियन स्कूल फायनान्स कंपनी (आयएसएफसी) ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. तसेच सध्याच्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याविषयीही शाळांचे मत जाणून घेण्यात आले. तिसरी लाट येण्याची शक्यता असूनही शैक्षणिक वर्ष 21-22 च्या दुसऱया तिमाहीत (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान) वर्ग सुरू करण्यास 50 टक्के शाळांनी तयारी दर्शविली असून 25 टक्के शाळा सप्टेंबरनंतर वर्ग सुरू करण्यास तयार आहेत.
सर्वेक्षणात देशभरातील एक हजार शाळांमधील कोरोनानंतरच्या काळातील शिक्षण प्रणालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जागतिक महामारीच्या उद्रेकानंतर शाळा आणि शिक्षण संस्था झपाटय़ाने किफायतशीर सोल्युशन देणाऱया ऑनलाइन शिक्षण पद्धतीकडे वळल्या. ऑक्टोबर 20 मध्ये 40 टक्क्यांपासून ते आज 70 टक्क्यांपेक्षा जास्त शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. आयएसएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप विरखरे म्हणाले, ‘शाळा आपल्या भौतिक इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून असतात. सध्याचा एक अत्यंत मोठा बदल म्हणजे डिजिटल दृष्टिकोनाचा स्वीकार. शाळा या ऑनलाइन वर्ग आणि आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डिजिटायझेशनची कल्पना अंगिकारत आहेत. शाळांना त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर गरजांसाठी फंडिंग करण्याच्या मुख्य कार्याबरोबरच पालकांना फी फायनान्सिंग करण्यावरदेखील तितकेच लक्ष देण्याचा आमचा मानस आहे.’
सर्वेक्षणात नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 मध्ये 552 शाळांचे सर्वेक्षण होते. त्यानंतर जून-जुलै 21 मध्ये 1000 शाळांचे सर्वेक्षण पार पडले. यातील 80 टक्के शाळा नोव्हेंबर 2020 पर्यंत 20 टक्क्यांपेक्षा कमी फी घेत होत्या. पण फी गोळा करण्याची क्षमता उल्लेखनीयरीत्या वाढली आहे आणि आता शहरी आणि निमशहरी भागातील शाळा 70 टक्क्यांपेक्षा जास्त फी घेऊ लागल्या आहेत. अगदी ग्रामीण क्षेत्रातदेखील इतकी फी घेणाऱया शाळांचे प्रमाण 35 टक्के झाले आहे.