चौफेर न्यूज
– शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी आणि योग्य ते ज्ञान मिळावं यासाठी ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट केल्यामुळे वियार्थ्यांना शेतीविषयी ज्ञान मिळू शकेल आणि याचा फायदा भविष्यात कृषी क्षेत्राला होईल. तसंच राष्ट्रीय शिक्षणात शेतीविषयक शिक्षणाच्या वाटा वाढवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणं अपेक्षित आहे. शालेय शिक्षणात कृषी क्षेत्राचा अभ्यासक्रम समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांना वातावरणीय बदल, शेतीबद्दलचा सखोल अभ्यास यांबद्दल ज्ञान मिळू शकेल.
राज्य सरकाराच्या या निर्णयाचं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. तसंच महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. शेतीचा अभ्यास शाळेत शिकवला गेला तर विद्यार्थ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसायात भविष्यात आमुलाग्र बदल घडतील, हे निश्चित” असं ट्विटही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.