चौफेर न्यूज – असं म्हणतात की शालेय जीवन हा आयुष्यातील ‘गोल्डन पिरियड’ अर्थात सुवर्णकाळ असतो. विद्यार्जनासोबत मित्र-सवंडग्यांच्या सोबतीचा हा काळ आनंदाने भरलेला आणि भारलेला असतो. अशा या निर्मळ आणि स्वच्छंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या हातून स्वयंप्रेरणेतून एखादं चांगलं काम घडलं तर शिक्षकांसोबत पालकांसाठीही ती अभिमानाची गोष्ट असते. इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या चि. राजवीर जाधव आणि रोनीत लाहोटी या दोन विद्यार्थ्यांनी साधू वासवानी मिशनच्या ‘शेअर टू केअर’ उपक्रमांतर्गत असंच कौतुकास्पद काम केलं आहे.
राजवीर आणि रोनीत या इंडस स्कूलमधील मित्रांनी साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून बालवाडी ते प्रथमवर्ग पदवीचे शिक्षण घेत असलेल्या 580 गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी आणि नोटबुक्स आदी शालेय साहित्य दिले. 3 रोजी हा कार्यक्रम पार पडला. दुर्दम्य इच्छाशक्ती असूनही परिस्थिती आणि साधनांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मिळालेल्या योग्य मदतीमुळे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कुष्ठरोग पुनर्वसन आणि कल्याणकारी संस्था, स्व. डॉ. मिनू मेहता नगर सोशल सर्व्हिस सेंटर, शांताई आणि महिला सेवा मंडळ या संस्थांच्या वतीने अशा प्रकारच्या गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि सहकार्य मिळवून दिले जाते. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती शिक्षणसाधनं गरजूंपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘रोनीत आणि राजवीर यांची आपल्यासारख्याच शाळकरी मित्रांसाठी मदतीला धावून जाण्याची ही कृती अत्यंत प्रेरणादायी आणि गौरवास्पद असून या लहानग्यांच्या उपक्रमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. इतरांनी यापासून प्रेरणा घ्यावी’, असे आवाहन या संस्थांच्या वतीने करण्यात आले.
‘स्वयंप्रेरणा, विनम्र भावनेतून कृती’
निस्वार्थ सेवा ही नेहमीच साधू वासवानी मिशनचा गाभा राहिली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि अध्यात्मिक अशा समाजजीवनाशी निगडित सेवा मिशनच्या कार्याचा भाग आहे. इतरांवर प्रेम करण्यासाठी माणसांमध्ये आध्यात्मिक अभिमुखता निर्माण करणे, यावर मिशनचा भर असतो. ‘‘साधू वासवानी मिशन अशा प्रकारच्या उदात्त कार्यांसाठी नेहमीच अग्रेसर असते. कुमारवयीन विद्यार्थ्यांशी भावनिक बंध जोडणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीमध्ये प्रेम, एकमेकांत वाटून घेण्याची भावना आणि एकमेकांची काळजी घेण्याचे संस्कार रुजविण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. रोनीत-राजवीर यांनी स्वयंप्रेरणेतून आणि अत्यंत विनम्र भावनेतून ही कृती केली. विशेष म्हणजे अशा प्रकारचे कार्य पुढेही चालू ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ही केवळ सुरुवात आहे. रोनीत-राजवीरसारख्या मुलांच्या हातून भविष्यकाळात असे अशी अनेक चांगली कामे होतील यात संशय नाही, अशी प्रतिक्रिया मिशनच्या वतीने देण्यात आली.