Chaupher News
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा आजपासून (३ मार्च) सुरू होत आहे. राज्यभरातून परीक्षेला १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यां बसणार आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाईल.
सर्व परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील.
विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच अधिकृत धरावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार करू नयेत. दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले.