चौफेर न्यूज – कल चाचणीला पर्याय म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑप्टिटय़ूड टेस्ट घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. दहावीच्या परीक्षेनंतर ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.
दहावीनंतर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे यावर त्यांचा कल जाणून घेण्यासाठी मागील चार वर्षांपासून सुरू असलेली कल चाचणी यंदा होणार नाही. त्याऐवजी एका वेगळ्या स्वरूपाची चाचणी घेण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे. यासंदर्भात राज्यभरातील समुपदेशकांसोबत एसएससी बोर्ड, महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या बैठका सुरू आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करीअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी याआधीच राज्यात 423 समुपदेशकांची टीम नेमण्यात आली आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना करीअरविषयक मार्गदर्शन करणार आहेत.
अशी असेल ऑप्टिटय़ूड टेस्ट
- राज्यभरात एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार. परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार.
- ऑप्टिटय़ूड, इंटरेस्ट, इंटीलिजन्स, पर्सनॅलिटीच्या आधारे होणार चाचणी.
- दुसऱया दिवशी निकालाच्या आधारे समुपदेशकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन