चौफेर न्यूज – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्या अहवालाचा दाखला देत शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दीक्षा अॅपच्या वापरात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने माहिती तंत्रज्ञानावर आधारित दीक्षा अॅपची निर्मिती केली होती. दीक्षा अॅपच्या देशातील वापरापैकी सरासरी 46 टक्के वापर महाराष्ट्र राज्यात केला जातो. वर्षा गायकवाड यांनी ट्विटवरुन त्याबाबत माहिती दिली आहे. (Varsha Gaikwad tweeted Maharashtra tops nation in use of DIKSHA app for school education )
2 लाख विद्यार्थ्यांकडून दीक्षा अॅपचा वापर
महाराष्ट्रातील दोन लाख विद्यार्थी दरदिवशी दीक्षा अॅपचा वापर करतात. दीक्षा अॅपच्या भारतात होणाऱ्या वापरापैकी एकूण 46 टक्के वापर महाराष्ट्र राज्यात होतो,अशी माहिती आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे.
वर्षा गायकवाड यांचे ट्विट
कोरोना काळात महाराष्ट्रानं केलेल्या उपाययोजना
महाराष्ट्र सरकारनं कोरोना काळात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले; जेणेकरून घरातूनच शिक्षण घेता येईल. इंटरनेट सुविधा नसलेल्या भागांत शैक्षणिक दिनदर्शिका सुविधा दिली. जिओ टीव्ही, दूरदर्शन व गुगल क्लासरूमसारख्या अद्ययावत सोयींमार्फत शिक्षण सुविधा पुरवण्यात आली.
जिओ टी.व्ही. च्या माध्यमातून 12 शैक्षणिक चॅनेलद्वारे तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहेत. दुरदर्शन वरील गली गली सिम सिम, टिली मिली, विविध ज्ञानगंगा, इत्यादी शैक्षणिक कार्यकमांद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आलं आहे.
आरटीई अंतर्गत 86 हजार विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश
प्रत्येक मुलास शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 नुसार, आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकातील 86932 विद्यार्थ्यांना आरटीई म्हणजे शिक्षणाच्या अधिकारा अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाला. तसेच 2019 ते 2021 दरम्यान 60341 विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले.