चौफेर न्यूज – देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डानं दहावी परीक्षा रद्द केल्या आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. सीबीएसईनं दहावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या निर्णयापूर्वीच महाराष्ट्र राज्य परीक्षा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. सीबीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानं महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांचं काय होणार याकडं विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं अशक्य, असल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेणं उचित शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच मतं आहे.
सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या 19 लाख आहे. तर, एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या 16 लाख आहे. याशिवाय बारावीची विद्यार्थी संख्या देखील वेगळी आहे. त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणं अशक्य आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी सीबीएसई बोर्ड अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे एक कार्यप्रणाली ठरवेल. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांना गूण मान्य नसतील त्यांची कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घेऊ, असं पोखरियाल म्हणाले होते.
सीबीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करु, असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात अजूनही बोर्डाची मूल्यमापन पद्धत ठरलेली नाही. राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न राज्यात राबवणार का? हे पाहावं लागणार आहे.