चौफेर न्यूज – सध्या राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याकडे पाहता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि परीक्षांबाबतही चर्चा करण्यात आली. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राज्यातील एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. गुणांमध्ये समानीकरण यावे यासाठी इतर मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत. तसंच श्रेणी सुधार हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी केव्हा व कशी द्यायची यासंदर्भातही निर्णय लवकरच कळवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.