चौफेर न्यूज – देशातील कोरोना स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक काही दिवसांनी जाहीर करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएसई’ बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
‘आयसीएसई’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र, बारावीची परीक्षा होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वीच ‘सीबीएसई’ बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ‘सीबीएसई’पाठोपाठ ‘आयसीएसई’ बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.