चौफेर न्यूज – कोरोनामुळे देशासह राज्यातील शिक्षण सेवेत अनेक समस्या आणि गोंधळ पाहायला मिळाला. दोन दीड वर्षानंतर शालेय शिक्षण आणि शिक्षण विभाग आता सावरलेला दिसत आहे. भविष्यात मुलांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील.
राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. उद्यापासून म्हणजे 14 ऑगस्टपासून सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. तर 17 ते 22 ऑगस्टदरम्यान उपलब्ध जागांची माहिती देण्यात येणार आहे. 23 आणि 24 ऑगस्टला मेरिस्ट लिस्ट लागणार आहे.