चौफेर न्यूज – महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करून बनवलेल्या ‘टास्क फोर्स’ने शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला आहे. ही त्यांची भूमिका अशास्त्रीय असून, सुयोग्य मापदंड पाळून आणि पूर्वतयारी करून शाळा सुरू करा, अशी मागणी ‘जन आरोग्य अभियान’ संघटनेने केली आहे.
असे निर्णय सार्वजनिक आरोग्य-शास्त्राच्या आधारे घ्यायला हवेत. पण ‘टास्क-फोर्स’ मध्ये या विषयातील तज्ज्ञांचा समावेश नाही. तो करावा. टास्क-फोर्सचा रिपोर्ट जाहीर करावा. खालील वैज्ञानिक तथ्ये, मुद्दे टास्क-फोर्सने लक्षात घेतलेली दिसत नाहीत, असा आरोपही संघटनेने केला आहे.
शाळा बंद ठेवल्याने मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडले आहे. अंगणवाड्या, शाळा बंद केल्याने तिथे मिळणारा शिजवलेला पूरक आहार बंद झाला आहे. घरी कोरडा शिधा दिला जातो. तो मुलांच्या वाट्याला येईल असे नाही. त्यामुळे गरीब थरातील मुलांमधील कुपोषण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शाळा सुरू केल्याने त्यांना आणि कुटुंबीयांना होणारा करोनाचा धोका याच्याशी या सर्व नुकसानीची तुलना करायला हवी, असे संघटनेचे म्हणणे आहे. बहुसंख्य मुलांना करोनाची लागण झाल्यास कोणताही त्रास होत नाही, लक्षणे दिसत नाहीत, गंभीर करोना आजाराचे प्रमाण अत्यंत कमी तर करोना मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे.
शाळा सुरू केल्या नाहीत, तरी मुलांमध्ये प्रौढ लोकांइतकीच लागण होत आहे. तर मग शाळा बंद ठेवून होणारे मुलांचे महाप्रचंड नुकसान लक्षात घेता आता यापुढे शाळा बंद ठेवणे सामाजिक आरोग्य-विज्ञानाशी विसंगत आहे. योग्य काळजी घेऊन अनेक शाळा सुरूही झाल्या असून त्यांचा अनुभव नकारात्मक नाही याची नोंद घ्यायला हवी, असेही जन आरोग्य अभियान संघटनेचे म्हणणे आहे.