चौफेर न्यूज –एमपीएससीनं (MPSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक आणि झटपट जाहीर करण्यासाठी एमपीएससीकडून लवकरच डिजिटल मूल्यांकन (Digital Assessment) पद्धतीचा वापर केला जाणार असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षांचे निकाल झटपट जाहीर करण्यासाठी एमपीएससी कडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची मूल्यांकन पारंपारिक पद्धती ऐवजी डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहेत. या पद्धतीमुळे एमपीएससी कडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक त्यासोबतच लवकरात लवकर जाहीर करण्यास मदत होणार आहे.
डिजिटल मूल्यांकन पद्धत – उत्तरपत्रिका स्कॅन करून त्याची एक पीडीएफ तयार होईल. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती संग्रहित करून ठेवलेली असेल. उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहिले असल्यास उत्तरपत्रिकेची तपासणी पूर्ण झालेली नाही, ही त्याच वेळी लक्षात येईल. डिजिटली मूल्यांकन करत असताना अचूक गुण उमेदवारांना दिले जातील. त्यासोबतच मूल्यांकनासाठी वेळ सुद्धा कमी जाईल. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरपत्रिकेची पीडीएफ प्रत त्याच्या अकाउंटवर पाठवली जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा पुनर्मुल्यांकनासाठीचा वेळ आणि पैसा वाचेल.
याआधी पारंपारिक पद्धतीने उमेदवारांच्या उत्तर पत्रिकांचे दोन वेळा मूल्यांकन केले जायचे लाखोंच्या संख्येत उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करताना वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर लागत होता. त्यामुळे लवकरच डिजिटल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे.