चौफेर न्यूज – महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपार कष्टाने गोरगरीब, बहुजन वर्गाला शिक्षणाची दारे खुली झाली. मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवले होते. त्यांच्याशी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून बहुजनांची गुलामगिरीतून मुक्तता केली. अशा बहुजनांचे आदरास्थान असणाऱ्या महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करून मनोवादी प्रवृत्तीला समर्थनच दिले आहे. त्यांनी त्वरित या महापुरुषांची माफी मागावी. अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात त्यांना पाऊल ठेवून देणार नसल्याचा संतापजनक इशारा संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. त्यांनी महात्मा फुले यांच्या पुणे नगरीत पाऊल ठेवताना आधी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी. केवळ माफी न मागता भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन पायउतार करावे. अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात पालकमंत्री पाटील यांचा नियोजित कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा सतीश काळे यांनी दिला. याला सर्वस्वी जबाबदार भाजपा पदाधिकारी असतील असेही काळे म्हणाले.
सतीश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालविल्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य मनुवादी प्रवृत्तीच्या विचारांचे असल्याचे दिसते. त्यामुळे बहुजन वर्गातील लोकांच्या भावना दुखावणारे व संतापजनक भावना निर्माण करणारे आहे. त्यामुळेच बेताल वक्तव्य केले जात आहे. त्यांना संभाजी ब्रिगेड जशास तसे उत्तर देणार आहे.