Chaupher News
मुंबई : राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत, त्यासाठीची निवडणूक फेब्रुवारी अखेरपर्यंत जाहीर होऊ शकते. भाजपकडून या निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आहेत. रामदास आठवले यांचं नाव आधीच निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचं निश्चित झाल्याचं समोर येत आहे.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील भाजप नेत्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडिक यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोन तासांच्या चर्चेनंतर उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहेत.
उदयनराजे भोसले यांनी यंदाची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती आणि जिंकलेही होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.