चौफेर न्यूज – राज्यातील खासगी शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेश अडचणीत आले आहेत. प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडूनही राज्यभरात 35 हजार 640 जागा शिल्लक आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शाळांकडून अडवणूक केली जात असल्याने राज्यभरातील पालक संकटात सापडले आहेत.
यंदा राज्यात 9 हजार 432 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 96 हजार 694 आरटीईनुसार 25 टक्के प्रवेशाच्या जागांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेश 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. यासाठी 61 हजार 44 विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या लॉटरीच्या माध्यमातून निश्चित केले होते, मात्र त्यातील असंख्य जागांवर अद्यापही शाळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यख प्रवीण यादव यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये आरटीईचे शुल्क सरकारकडून मिळाले नसल्याचे सांगत हे प्रवेश नाकारले जात आहेत.
मुंबईत 3 हजार 725 जागा रिक्त
राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या आरटीईच्या राखीव जागांपैकी तब्बल 35 हजार 640 जागा रिक्त असून त्यात मुंबईतील 3 हजार 725 जागांचा समावेश आहे. यातील काही जागा या प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली. खासगी शाळांचे आतापर्यंत 1 हजार 800 कोटी रुपये सरकारकडून आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचे येणे बाकी असून ते सरकारने लवकरात लवकर देण्याची मागणी ‘मेस्टा’ या संस्थाचालक संघटनेने केली आहे.
शाळा – 9432
एकूण जागा – 96,684
निश्चित झालेले प्रवेश – 61,044
रिक्त जागा – 35,640
मुंबईतील शाळांची स्थिती
शाळा – 352
एकूण जागा – 6493
निश्चित झालेले प्रवेश – 2768
रिक्त जागा – 3725