Chaupher News
पिंपरी : नागरिकांना त्यांच्या महानगरपालिका क्षेत्रात उत्तम दर्जाचे राहणीमान योग्य निर्माण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. दिनांक १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणा-या या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये राहण्यास योग्य शहर, महानगरपालिकेचे कामकाज व शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेवून सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग असून आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल स्थानांकन प्राप्त व्हावे याकरिता नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
नागरिकांना पुरविण्यात येणा-या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र शासनाने निश्चित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणेसाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाद्वारे प्राप्त होणा-या माहितीमुळे प्रशासनास नागरिकांना देण्यात येणा-या सुविधांबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे. यामुळे प्रशासनास नागरिकांच्या अडचणी व समस्या याबाबत माहिती मिळण्यास व त्यांचे निराकरण करण्यास देखील मदत होईल. महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा. आपण आज महाराष्ट्रातील सर्वोत्तम सुविधा असलेल्या शहरांपैकी एका शहरामध्ये राहत आहोत. नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेवून आपल्या शहराला अधिक सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणा-या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण २०१९ चा क्यूआर कोड स्कॅन करून या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा. नागरिकांनी राहणीमान सर्वेक्षणामध्ये सहभाग घेवून सर्व प्रथम https://eol2019.org/citizenfeedback या संकेतस्थळावर जाऊन तसेच सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेवून आपले मत नोंदवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सर्वेक्षणा अंतर्गत नागरिकांना प्रामुख्याने ३ निर्देशाकांवर प्रश्न विचारण्यात येतील यामध्ये शिक्षण व आरोग्य सुविधा यांचा दर्जा, उपलब्धता व क्रयशक्ती यांसारख्या प्रश्नांचा समावेश असेल. यामध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तरासाठी पूर्ण सहमत, सहमत, समाधानी, असमाधानी व पूर्ण असमाधानी हे ५ पर्याय उपलब्ध आहेत. गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राहणीमान सर्वेक्षण हे प्रामुख्याने राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता आणि चिरंतन व स्थायी सुविधा आदी गोष्टींचा सर्वेक्षणात विचार करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, सुरक्षा, विकास, आर्थिक संधी आदींचा देखील समावेश असणार आहे. केंद्र सरकार देशातील ११४ शहरांचा प्रगती अहवाल तीन प्रकारांमध्ये घोषित करणार असून यामध्ये राहण्यास योग्य शहर, महानगरपालिकेचे कामकाज व हवामान इत्यादीचा समावेश असेल. सदर अहवाल जून महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे.