जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी चालू टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना गेहलोत यांनी अनेक लोकप्रिय आश्वासनांची घोषणा केली. उज्ज्वला योजनेंतर्गत त्यांनी सर्व कुटुंबांना 500 रुपयांचे सिलिंडर आणि 100 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. दरमहा गरीब कुटुंबांना मोफत अन्नाची पाकिटे देण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या एक कोटी कुटुंबांना दरमहा मुख्यमंत्री अन्नपूर्णा फूड पॅकेट देण्याची घोषणा केली. यामध्ये एक किलो डाळ, साखर, मीठ, एक लिटर तेल, गरम मसाले दिले जाणार आहेत. यासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. बीपीएल आणि उज्ज्वला योजनेंतर्गत येणारी कुटुंबे जास्त किंमतीमुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकत नाहीत. या 76 लाख कुटुंबांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, गेल्या अर्थसंकल्पात दरमहा ५० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. पुढील वर्षापासून मुख्यमंत्री मोफत वीज योजना सुरू करून महिन्याला 100 युनिट वीज दिली जाणार आहे. एक कोटी १९ लाखांपैकी १ कोटी ४० लाख कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे. आणखी 15 लाख घरगुती ग्राहकांनाही स्लॅबनुसार दिलेली सवलत मिळत राहिल. त्यामुळे सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.