कोल्हापूर : काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडल्यास त्यांचे नेतृत्व आजही आम्ही मान्य करू, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिर आवारात करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवल्यामुळे जनतेने आम्हाला आमदार केले. आम्हाला विकत जायचे असते तर आम्ही मागील अडीच वर्षातच गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेली नाही, तर त्यांनीच आम्हाला पक्ष सोडायला लावला आहे. दिल्लीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली असता हिंदुत्व आम्ही सोडले असून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जात असल्याची त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्यानंतर ही चूक दुरुस्ती करू अशी त्यांनी सांगितले होते. त्यांनी दिलेलं शब्द पाळला नाही आणि जनतेची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने फसवले आणि त्याचा राग आमच्यावर काढला आहे. खोकी घेतली म्हणतात. खोक्यावर खेळण्याची सवय आदित्य ठाकरे यांनाच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोकणचा २५ कोटीचा निधी अजित पवारांनी रोखून धरला. त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टाने हसत होते. याबाबतचे व्हिडिओही आज उपलब्ध आहेत. बाळासाहेबांनी कोकणातील माणसांच्या जीवावर शिवसेना उभी केली. आज याच कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतेराशे कोटी दिले आहेत त्यामुळे आज कोकणचा विकास होऊ लागला आहे.