पिंपरी (दि. 5 जानेवारी 2017) महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये अनेक रत्न जन्माला आली. पुण्यभूमीत जन्मलेले जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजाला आपल्या कार्यकर्तृत्वाने नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे जनकल्याण झाले, असे प्रतिपादन गुरुवर्य शांतीब्रम्ह हभप मारोती महाराज कु-हेकर यांनी पिंपरीगावात मंगळवारी (दि. 3 जानेवारी) केले.
पिंपरी गावातील जोग महाराज प्रासादिक दिंडीला (तुकाराम महाराज पालखी सोहळा रथामागे क्र. 49) 25 वर्षे पुर्ण झाली आहेत. तसेच आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून पिंपरी वाघेरे येथील जोग महाराज प्रासादिक दिंडी आणि पिंपरी वाघेरे ग्रामस्थांच्या वतीने धर्माचार्य हभप शंकर महाराज शेवाळे यांचा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘तुका आकाशा एवढा’ कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गुरुवर्य शांतीब्रम्ह हभप मारोतीबाबा महाराज कु-हेकर यांना ‘जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुरस्कार’, तसेच श्रीक्षेत्र देहू येथील गाथा मंदिराचे संस्थापक हभप पांडुरंग महाराज घुले यांना ‘पालखी प्रवर्तक वै. नारायण महाराज देहूकर पुरस्कार’ श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप शांताराम मोरे यांच्या हस्ते तर हभप माऊली महाराज वाळुंजकर (जय बाबा) यांना ‘स्वा. सुखनिवासी जोग महाराज प्रासादिक दिंडी पुरस्कार’ महामंडलेश्वर श्रीमहंत विद्यावाचक हभप डॉ. रामकृष्ण दास महाराज लहवितकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. धर्माचार्य हभप शंकर महाराज शेवाळे यांचाही या प्रसंगी गौरव करण्यात आला. त्यावेळी कु-हेकर महाराजांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी आयोजक नामदेवराव आनंदराव जाचक, गणपतराव (नाना) जाचक, दिंडीचे अध्यक्ष हभप चिंधाजी गोलांडे मामा, शेखर कुटे, जोपाशेठ पवार, श्रीरंग शिंदे, हभप संभाजी महाराज मोरे, हभप शंकर महाराज शेवाळे आदी उपस्थित होते.
हभप लहवितकर महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भक्तीमार्गाने महाराष्ट्रातील जनतेला सहज, सोपे असे भक्तीमार्गाचे व्दार उघडले गेले. सद्यपरिस्थिती पाहता समाजाला तुकाराम महाराजांचे आचार आणि विचार आचरणात आणण्याची राष्ट्राला गरज आहे. त्यातूनच एक सुसंस्कृत समाज निमार्ण होईल. तुकोबांच्या अभंगांमधून सामाजिक मुल्यांचे मौलिक विचार मांडण्यात आली आहे. असेही हभप लहवितकर महाराज म्हणाले.
यावेळी हभप जालिंदर महाराज काळोखे तसेच कथामृत सोहळ्यातील सेवेकरी श्रीधर राजगुरु, मनोज शिंदे, संतोष आडागळे, किशोर कापसे, सुनील फुलसुंदर, अमोल मोरे, प्रकाश पानघंटी, राहुल नाणेकर यांचा सत्कार करण्यात आला. कथामृत सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमास पिंपरीगाव आणि पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.