धुळे : रस्तावरचे अपघात कधी घडतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना अपघात म्हणतात. अपघात कमी करण्याची जबाबदारी केवळ एका विभागाची नाही, तर ती सर्वांचीच आहे. नागरिकांनी एकमेकांचा सन्मान केला, तर वाहतुकीला शिस्त लागू शकते. रस्ता सुरक्षा अभियान तुमच्या आमच्यासाठीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे शहर पोलिस, धुळे ग्रामीण पोलिस, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 28 व्या रस्ता सुरक्षा अभियान- 2017 चे उदघाटन आज झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस., प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे, ध्रुव मोटर्सचे संचालक आशिष पाटील व्यासपीठावर होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक माहिती देणाऱ्या विविध माहिती पत्रकांचे अनावरण करण्यात आले. तसेच गेल्या वर्षी रस्ता अपघातातून चौघा विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका करणारे शिक्षक जी. के. ठोंबरे यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे म्हणाले, पाश्चात्य देशात वाहतुकीला शिस्त आहे. ही शिस्त तेथील नागरिकांनी लावून घेतली. आपणही वाहतुकीचे नियम समजून घेत शिस्त लावून घेतली पाहिजे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख म्हणाले, वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे, असे पोलिस अधीक्षक श्री. चैतन्या यांनी सांगितले. ते म्हणाले, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे.
श्री. मोरे, राऊत यांनी श्री. राऊत यांनी प्रास्ताविक केले. श्री. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. जाधव यांनी आभार मानले. यावेळी परिवहन, पोलिस विभागासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.