पिंपरी :- मोबाईलसाठी कर्ज काढून देतो, असे सांगत २५ जणांच्या नावावर सुमारे ३० लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली. नीलेश सुनील जाधव (वय ३२, रा. सुदर्शनगनर, पिंपळे गुरव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राहूल ऊर्फ रजनीकांत आनंद शर्मा (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी २०१९ ते मे २०१९ या कालावधीत ही घटना घडली. तुम्हाला मोबाईलसाठी कर्ज काढून देतो, असे सांगत आरोपी शर्मा हा नागरिकांकडून पॅनकार्ड, आधारकार्ड, धनादेश आणि इतर कागदपत्रे घेत असे. त्यानंतर त्या कागदपत्रांच्या आधारे महागडे मोबाईल खरेदी करीत असे.खरेदी केलेले मोबाईल संबंधितांना न देता परस्पर त्याचा वापर करीत असे. इतरांच्या नावावर काढलेल्या कर्जाचे हप्ते संबंधितांना भरण्यास भाग पाडत असे. त्याने आत्तापर्यंत अशाप्रकरणी सुमारे २५ जणांची २९ लाख ९२ हजार ३९५ रुपयांची फसवणूक केली आहे.