पिंपरी ः परदेशात पाठविलेला काळा पैसा परत भारतीय चलनात आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या बचत खात्यामध्ये 15 लाख ठेवू अशा पोकळ वल्गना करुन सत्तेवर आलेले भाजपा सरकार मागील दोन वर्षांच्या काळात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे, माध्यमांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी साप सोडून भुई धोपटण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे देशामध्ये एक प्रकारे आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे.
हुकूमशाही पध्दतीने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेसह, शेतकरी, उद्योजक तसेच व्यापारी व्यवसयिकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. आगामी काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन अर्थ व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा निर्णय सर्व जनतेला गोंधळात टाकणारा आहे. सामान्य लोकांचे बँकेत बचत खातेही नसते, त्यामुळे त्यांनी रोख स्वरुपात बचत केलेल्या नोटा कशा बदलाव्यात हा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारा कामगार, हातगाडी, पथारी व्यवसायिकांच्या उत्पन्नावर यामुळे प्रतिकुल परिणाम होईल. पाचशे व हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने रोख रक्कम जवळ बाळगणे अवघड होणार आहे. हा निर्णय घेताना सर्वसामान्य लोकांचा विचार झालेला नाही. कोणतीही पूर्व सुचना न देता एका रात्रीत नोटा चलनातून बाद करणे योग्य नाही. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील महिनाभर बँकेमध्ये गर्दी होईल. ग्राहक व बँकेच्या कर्मचा-यांमध्येही गोंधळ निर्माण होईल. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाचा उत्पादन व सेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल. पंतप्रधानाच्या निर्णयामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये व बाजारपेठेत एकच गोंधळ निर्माण झाला आहे. असे ही साठे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.