पिंपरी : राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्यातील बैलगाडा मालकांना एकत्रित करून लढा सुरू केला आहे; मात्र शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात मीच बाजी मारणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात खासदार-आमदार यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून राजकीय श्रेयवाद रंगणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू आहे. 7 मे 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. दरम्यान, आमदार महेश लांडगे आणि बैलगाडा मंडळाच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. जानेवारी 2016 मध्ये राजपत्रात समाविष्ट असलेल्या बैल या जातीवरील प्रदर्शन व प्रशिक्षण यावरील बंदी अध्यादेश काढून उठविण्यात आली होती.
पुन्हा प्राणीमित्र संघटना व अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले. जानेवारी 11, 2016 रोजी यासंदर्भात बैलगाडा मालकांच्या वतीने कॅव्हेट दाखल करण्यात आले. जानेवारी 12, 2016 रोजी केंद्र सरकार व प्राणी मित्र संघटना यांच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने तात्पुरर्ती स्थगिती दिली होती. यावर युक्तीवाद झाल्यावर न्यायालयाने 16 नोव्हेंबर ही तारीख दिली असून, यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास राज्यमंत्री पॉन राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
जल्लीकुट्टी व बैलगाडा शर्यतीबाबत केंद्र सरकारने कायदा करावा, यासाठी भाजपचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांचीही भेट घेऊन आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारने कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे बाळासाहेब टाकळीकर, बाळासाहेब आरुडे, संदीप बोदगे आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही बैलगाडा मालकांची बैठक घेऊन चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला आहे.
बैलगाडा शर्यतीचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपआपल्यापरीने पाठपुरावा सुरू केला आहे. मध्यंतरी खेड तालुक्यातील विमानतळाच्या मुद्यावरून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी कोंडी केली होती. आता आमदार महेश लांडगे बैलगाडा शर्यतीबाबत कोणता डाव खेळतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.