कल्याण : कल्याणमधील गौरी पाडा परिसरात एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. प्रणव भोसले असे या मुलाचे नाव असून मुलाच्या आईच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या आरोपी नितीन कांबळे याला ताब्यात घेतले असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत खडकपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
आरोपी नितीन कांबळे सोमवारी पीडित प्रणव भोसले याला शाळेपासून इमारतीच्या बांधकामाधीन असलेल्या भागात घेऊन गेला होता, जिथे तो सुरक्षा रक्षक (वॉचमन) म्हणून काम करतो. मात्र मूल परत न आल्याने प्रणवची आई कविता यांनी स्थानिक खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधून तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, कविताच्या संशयावरून पोलिसांनी कल्याणमधील गौरीपाडा परिसरात असलेल्या सुंदर रेसिडेन्सी इमारतीला भेट दिली आणि त्यांनी नितीनला पकडले आणि चौकशी केली असता त्याने पाण्याच्या टाकीत बुडवून प्रणवची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि प्रणवची आई हे दोघे पूर्वी एकाच ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याने त्यांची मैत्री होती. नितीनला विधवा असलेल्या कवितासोबत लग्न करायचे होते. मात्र ती नकार देत असल्याने नितीनने तिच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. नितीनने त्याच्या फेसबुक पेजवर एक चिठ्ठी टाकल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे, ज्यामध्ये कविता आणि तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या छळाला कंटाळून आपण आपले जीवन संपवणार असल्याचा दावा केला आहे. कविताने ५० हजार रुपये घेतले असून ती परत करत नसल्याचेही त्याने नमूद केले. आपले कृत्य लपवण्यासाठी नितीन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने एका महिलेने माझे घेतलेले पैसे न दिल्याने मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. दुसरीकडे कविता यांनी शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव घरी न आल्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसाना संशय आल्याने त्यांनी तत्काळ नितीनला ताब्यात घेत चौकशी केली त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. दरम्यान आर्थिक व्यवहारामुळे त्याने मुलाची हत्या केली की आणखी काही कारण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी जात मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.