पिंपरी : देशातील भ्रष्टाचार, लोकशाही व्यवस्था याला राजकारण्यांइतकीच जनताही जबाबदार असते, कारण जनतेने निवडून दिलेले लोकच लोकशाही व्यवस्थेचे भाग असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची जबाबदारी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे सह्याद्री वाहिनी, युनेस्को अध्यापन, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमायटी पुणे यांच्या सहकार्याने तर भारतीय छात्र संसद फाउंडेशन व नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन यांच्या पाठिंब्याने दिल्या जाणाऱ्या ‘आर्य चाणाक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. उज्जवल निकम, आमदार कपील पाटील, सनदी अधिकारी डॉ. नितीन करार, ज्येष्ठ संपादक देवकिसन सारडा, उद्योजक प्रमोद चौधरी यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, महावस्त्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. आंध्रप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष डॉ. कोडेला शिवप्रसाद राव, माईर्स एमआयटीचे शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटीचे अधिष्ठाता शरदचंद्र दराडे-पाटील, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव डॉ. मंगेश कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक दीपक आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलजा हरदास, प्रा. गौतम बापट आदी यावेळी
उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. दीपक आपटे यांनी आभार मानले.