मुंबई – जिओने आणलेल्या स्वस्तातल्या मोबाईल सेवेमुळे बाजारपेठेमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा थेट फायदा हा ग्राहकांना होत आहे. एकीकडे व्होडाफोन भारतातून आपला गाशा गुंडाळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच आता संकटात सापडलेल्या बीएसएनएलने जिओला शिंगावर घेण्यासाठी कंबर कसली आहे. जिओने नुकतेच ग्राहकांना इतर कंपन्यांच्या क्रमांकांवर फोन केल्यास ६ पैसे आकारले जाणार असल्याच निर्णय जाहीर केला. त्याला उत्तर म्हणून सार्वजनिक क्षेत्रातल्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने एक भन्नाट योजना आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. या योजनेनुसार जर बीएसएनएल ग्राहकांनी मोबाईल कॉल केला, तर कंपनीच ग्राहकांना उलट ६ पैसे कॅशबॅक देणार आहे.
काय आहे योजना?
ही योजना बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी असेल. बीएसएनएलच्या वायरलाईन, ब्रॉडबँड किंवा एफटीटीएच सेवेद्वारे जर ग्राहकांनी कॉल केला, तर त्यांना कॅशबॅक मिळणार आहे. ५ मिनिटांच्या वर जाणाऱ्या प्रत्येक मिनिटासाठी बीएसएनएल ग्राहकांना ६ पैसे कॅशबॅक देणार आहे. जिओ किंवा अन्य कंपन्यांमुळे घट झालेल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी बीएसएसएलने ही योजना आणली आहे. जिओने ६ पैसे आकारल्यामुळे ग्राहकांमध्ये असलेली नाराजी आणि अतिस्पर्धेमुळे बाद होणाऱ्या इतर मोबाईल कंपन्या या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने संधी साधण्यासाठीच योजना आणल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या योजनेमुळे बीएसएनएलला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेचा एमटीएनएलच्या ग्राहकांना देखील फायदा मिळण्याची शक्यता आहे.