चौफेर न्यूज – राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केली होती. मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संभ्रम दूर केला असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली.
दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश परीक्षाबाबत पुढे म्हणाल्या, ‘इयत्ता अकरावी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.’