चौफेर न्यूज – कोरोना काळात शिक्षणाचे तीन तेरा वाजलेत. ग्रामीण भागातून शहरात इंजिनीयरिंगसाठी आलेले विद्यार्थी पुन्हा आपल्या गावी परतले आहेत. शिक्षण जरी ऑनलाईन पद्धतीनं शिकवलं जात असलं तरी, या विद्यार्थ्यांना अनावश्यक फी भरावी लागत आहे. अशात आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.
कोरोना परिस्थितीचा विचार करून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे.
‘शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्कही भरावे लागते. त्यात ग्रंथालय, जिमखाना व अन्य सुविधांचा समावेश आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी या सुविधांचा वापर केला नसल्याने त्यांना इतर शुल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असं सामंत यांनी सांगितलं आहेे.