चौफेर न्यूज – दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील 96 टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत 100 टक्के शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता राज्य शिक्षण मंडळातील सूत्रांनी वर्तवली.
1 जुलैपर्यंत राज्यातील 96 तर मुंबई विभागातील 93 टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले आहे. राज्य शिक्षण मंडळाने 30 जूनपर्यंत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अपलोड करण्यासाठी मुदत दिली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे शाळा विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करू शकलेले नाहीत. अशा शाळांना गुण अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. सर्व शाळांचे गुण अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 ते 20 जुलैदरम्यान दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे.