कधी लागलेला हळवा सूर, तर कधी मिष्कील जुगलबंदी, मधूनच मारलेल्या कोट्या, चिमटे, एकमेकांना मारलेल्या शाब्दिक कोपरखळ्या यांनी अत्यंत खेळीमेळीत दिलखुलास इर्शाद रसिकांच्या मनाच्या तारा छेडून गेला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अठराव्या स्वरसागर महोत्सवात शुक्रवारी (23 डिसेंबर) ‘इर्शाद’ हा काव्य गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. कवी व गीतकार संदीप खरे व वैभव जोशी यांच्या सोबतीने गायिका सावनी शेंडे हिने गायलेल्या अनेक रचनांनी रसिक भारावून गेले.
नातं, पाऊस, मित्र अशा अनेक विषयांवरील भावगर्भ कविता यावेळी संदीप व वैभव यांनी सादर केल्या. ’मी अमावस्येला चंद्र पाहिला होता’, ‘झोपेच्या कागदावर जागरणांच्या आसवांनी मी कविता लिहित असेन, सुखात आहे ऐकतो हे कसे जमवतेस सांग ना’ याशिवाय ‘तुझं खरं की, माझं खरं’ या संदीपनी सादर केलेल्या अत्यंत वास्तववादी व तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातील भावना व्यक्त करणा-या दिलखुलास कवितेने रसिकांच्या टाळ्यांनी दाद मिळवली. मग साधारणपणे हेच भाव व्यक्त करणा-या वैभवच्या ‘देवाशी भांडण’ या कवितेने रसिकांना अंतर्मुख करायला लावले.
या दोघांच्या सोबतीने शास्त्रीय संगीत गायिका अशी ओळख असलेल्या सावनी शेंडे हिने फक्त तंबो-याच्या साथीने शब्दांना बोलके करीत अनेक रचना अत्यंत ताकदीने सादर केल्या. शास्त्रीय संगीतात रागाला जास्त महत्व असते. त्यामानाने शब्द दुय्यम असतात. अशावेळी कधीकधी शब्दसुद्धा कसे प्रभावी असतात हे सोदाहरण दाखवून दिले. त्यासाठी सावनी हिने बसंत रागातील आशा – निराशेच्या छटा दाखवणा-या दोन रचना सादर केल्या. तसेच तिची स्वत:ची ‘अनामिक’ ही रचना सादर केली. संदीप खरे रचित’ अरे नाही जमणार मला हाक नको देऊ’ या रचनेला स्वरसाज चढवून ती स्वत: सादर केली.
‘सूर जाहला ईश्वर, शब्द झाले मायबाप, शून्य झाले देणेघेणे, काय पुण्य काय पाप’ या रचनेनंतर ‘अवघा रंग एक झाला’ या सावनीने गायलेल्या रचनेने या अनोख्या मैफलीची सांगता झाली. या तिघांनाही मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या मिष्कील शैलीतून बोलते केले. अत्यंत वेगळ्या प्रकारच्या या मैफलीने रसिकांच्या मनाचे हळवे कोपरे जागवून त्यावर आश्वासक फुंकर घातल्याचा प्रत्यय आला.
त्यानंतर ‘रंग सप्तसुरांचे’ हा मराठी -हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. संदीप उबाळे, योगिता गोडबोले-पाठक, प्रियांका बर्वे, रवींद्र शाळू, चैत्राली अभ्यंकर यांनी यावेळी अनेक गीते सादर केली. ‘गणनायकाय गणदैवताय’ या संदीप उबाळे याने गायलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर योगिता गोडबोले-पाठक यांनी ‘दिस चार झाले मन’ ही रचना सादर केली. प्रियांका बर्वे हिने तिची आजी ज्येष्ठ भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांच्या ‘कुणीही पाय नका वाजवू’, ‘त्या तिथे पलीकडे’, ‘लपवलास तू हिरवा चाफा’ या रचना सादर करुन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ‘बाई बाई मनमोराचा’, ‘सत्य शिवाहून सुंदर हे’, ‘कधी तू रिमझिम झरणारी बरसात’, ‘डौल मोराच्या मानंचा’, ‘जीव रंगला, दंगला’, ‘कजरा मोहोब्बतवाला’ यासारख्या एकाहून एक सरस चढत्या क्रमाने रंगत गेलेल्या रचनांनी उपस्थित प्रेक्षक दंग झाले.