अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन करणार नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे. शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या जनेतने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं होतं. महाराष्ट्रात भाजपाला संपूर्ण जनादेश देत १०५ जागा दिल्या. आम्ही शिवसेनेसोबत ही निवडणूक लढलो. भाजपाला जनादेश होता असं मी यासाठी म्हणतो आहे कारण ७० टक्के जागा आम्ही जिंकलो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महायुतीला जनादेश होताच पण भाजपाला सर्वात मोठा जनादेश होता. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शिवसेनेच्या नंबरगेम लक्षात आला तेव्हा त्यांनी न ठरलेली गोष्ट रेटली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे ठरलेलंच नव्हतं. अमित शाह यांनीही ही गोष्ट स्पष्ट केली. शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच धमकी देऊन कुणाहीसोबत जाऊ असं म्हटलं.
जे ठरलं ते देऊ जे ठरलं ते देणार नाही हे आम्ही शिवसेनेला सांगितलं. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करत राहिले. जे लोक मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते ते बाहेर पडून इतरांच्या पायऱ्या झिजवत होते. सुरुवातीला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्हाला बोलवण्यात आलं. मात्र आमच्याकडे बहुमताचा आकडा शिवसेना सोबत आल्याने नव्हता. मग शिवसेनेला बोलवण्यात आलं. त्यांनी स्वतःचं हसं करुन घेतलं. राष्ट्रवादीनेही स्पष्ट केलं की त्यांच्याकडे संख्याबळ नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागली. भाजपाला दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष झटू लागले आहेत. अजित पवार यांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी सहकार्य करायचं ठरवलं. त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेच्या अनुरुप ते पत्र दिलं ज्या आधारे आम्ही सरकार स्थापन केलं. आज कोर्टाचा निर्णय आला तेव्हा बहुमत सिद्ध करायचं आहे त्यावेळी अजित पवार यांनी मला भेटून सांगितलं की मी राजीनामा देतो. मी या युतीत येऊ शकत नाही.