चौफेर न्यूज – कोरोनामुळे पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र उन्हाळी सुट्टी सुरू झाली तरी बहुसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच मिळालेले नाही. वर्गोन्नती देऊन विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम अद्याप सुरू असून सध्याची कोरोनाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांना जूनपर्यंत प्रगतीपुस्तक मिळण्याची शक्यता आहे.
पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार 100 गुणांपैकी जाहीर केला जाणार असून मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांची संपादणूक पाहून त्याचे रूपांतर 100 गुणांमध्ये करून विद्यार्थ्याची श्रेणी ठरवली जाणार आहे. शहरी भागातील खासगी शाळांनी विद्यार्थ्यांचे निकाल ईमेलद्वारे पालकांना पाठवले असून कोरोनाविषयी खबरदारी घेऊन आता किंवा जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तक देण्याचे नियोजन शाळांनी आखले आहे.