चौफेर न्यूज – राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत.
राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली.
संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केल्यानंतर आज आरोग्य विभागाकडून देखील मोठ्या नोकर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मागील काळात सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील. पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार करणार आहे.