पुणे – कोयता गँगबाबत राज्यभर धुमाकूळ सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित कोयता गँगबाबत कडक कारवाई होताना दिसेल असे सांगत दहशत कोयता गँगची नव्हे तर पोलिसांचीच पाहिजे, असे म्हंटले आहे. पोलीसांनी याबाबत कडक कारवाई सुरू केली असून, अजूनही अधूनमधून कोयता गँगच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्यांना ठेचूनच काढले पाहिजे. आगामी काळात अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्यांवर वेगळ्या प्रकारे कारवाई होताना दिसेल, असेही यावेळी ते म्हणाले.
पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पोलिसांची दहशत लोकांवर, दुकानदारांवर नाही तर गुन्हेगारांवर असली पाहिजे. त्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यासाठी येत्या काळात आणखी काही उपाययोजना केलेल्या असतील. येत्या काळात स्ट्रीट क्राईम कमी होईल. आगामी काळात व्हाइट कॉलर क्राईम, इकॉनमिकल क्राईम संख्या वाढली आहे. एकेकाळी इकॉनमिकल क्राईमला काही काम नसायचे. आता मात्र सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही आता सायबर लॉमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा तयारीत आहे.
काहींचा उद्योगजकांकडून पैसे वसूल करण्याचा व्यवसाय झाला आहे. अशा लोकांना ठेचून काढायचे आम्ही ठरवले आहे. तर माथाडी संघटनेच्या नावाखाली पैसे घेऊन जाणे आता चालणार नाही. येत्या काळात पुन्हा मोठ्या संख्येने उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. अशावेळी गुंडागर्दी होणार असेल तर हे उद्योग येणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे गुंडागर्दी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.